इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे.


 इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे. हा लेख जानेवारी २००५ मध्ये दैनिक सम्राट आणि क्रांतिसिंह या वृत्तपत्रांमध्ये मध्ये छापून आला होता. आजही हा लेख संभाजी भिडे आणि भीमा कोरेगाव या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या लेखाचे पुन:मुद्रण करत आहे.

इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे.

दुर्गा दौड, ब्राह्मण दौड, शिव दौड, धारतीर्थ यात्रा अशी नावे घेवून ही यात्रा कोणता संदेश देते? देशप्रेमाचा? धर्मनिरपेक्षतेचा? की दहशतीचा? हजारो युवकांना बेकारी विषमता दारिद्रयाविरुद्ध लढण्याचे बळ न देता, शिक्षण न देता, इतरांच्या विरुद्ध चिथावणी देणारी ही यात्रा तिचे अंतर्गत हेतू, तिचा असली चेहरा, इथले पोलीस खाते, शासन तपासणार आहे का? ही घंटा यात्रेत मला ऐकावयास मिळाली. म्हणून हे मनोगत मांडत आहे.

धारातीर्थयात्रेचे कसले तरी पत्रक २ मुळे झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात आलेली. उन्हातान्हाने मळकटलेले कपडे व तसेच चेहरे देखील. कमरेला शेला बांधलेला हा मुलगा मला अगदी खेड्यातला व शहरात कसे राहावे हे कळत नसावे असा वाटला. त्यांनी दिलेले पत्रक वाचत होतो. शिवाजी महाराजांचा फोटो त्या पत्रकावर आणि काहीबाही मजकूर. निरनिराळ्या किल्ल्यांवर व गडावर काढलेल्या सहल मोहिमा व आवश्यक सूचना त्यावर होत्या. पत्रकावर हिंदुत्ववादाची (ब्राह्मणवादाची) छाप वाटत होती. मात्र ते पुरोगामी वाटावे अशी बेमालूमपणे त्याची रचना घडविलेली. पत्रकात उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आबा पाटील यांची मोहिमेत प्रमुख उपस्थिती अस छापलेलं. याने कुणालाही अचंबा वाटावा. ते पत्रक काढलं होत डॉ श्री. दत्ताजीराव पा. माने (अध्यक्ष. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान) यांनी.

त्या मुलाजवळ चौकशी केली असता कळले, उद्या साताऱ्यात एक यात्रा येणार आहे. हिंदू धर्माची, पन्नास हजार लोक आहेत असे त्यांनी सांगितले.

दुपारी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांचा आवाज. सर्वांच्या माना डोकावल्या. पंधरा सोळा तरुण पोरे डोक्यावर गांधी टोपी, भगवे फडके बांधलेली, हातात काठी व काहींच्या कमरेला तसलेच लाल फडके. त्यांच जसं आकर्षण वाटलं तसचं त्या पोरांचं चाललय काय याची उत्सुकता चाळवली गेली.

आज ठरवून पावणे आकरा वाजता राजवाड्यावर गेलो. यात्रा तिथल्या गांधी मैदानावर होती. म्हणून मैदानावर छानसा मंडप, दोन ठिकाणी कमानी, स्वच्छ परिसर, कडक बंदोबस्त. ती यात्रा येणार म्हणून सातारकरांवरच चिडणारा, त्यांच्यावर खेकसणारा, दमदाटी करणारा.

आवाज आले कसलेतरी... यात्रा आली. भली मोठी यात्रा. हातात मोठाल्या काठ्या घेवून आलेली तरुण पोरे. ‘हिंदू धर्म की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ व अशाच काहीशा घोषणा देत आलेली. त्यातील काहींच्या हातात नंग्या तलवारी, भाले, कट्यारी, कोयते, करवती, कुऱ्हाडी सारखी हत्यारे. त्यांचे बेभान होऊन मुस्लीम विरोधी घोषणा देणे, गाणी म्हणणे. त्यांचे पेहेराव ही सारखेच. जणू टाईम मशीन मध्ये जावून शिवाजीच्या काळात तर आपण प्रवेश केला नाही ना? किंवा चिमटा काढून बघावा आपण स्वप्नात तर नाही ना? इतकं ते विचित्र, विक्षिप्त व विलक्षण दृश्य.

क्षणभर वाटावं की हे एक सैन्य आहे. कुणाशी तरी लढायला निघालंय. विशिष्ट ठिकाणी गेल्यावर आता तुंबळ युद्ध होणार, माणस कापली जाणार. कशासाठी हवीत ही हत्यार? कशासाठी ह्या काठ्या? आणि हे हे हे सर्व बरोबर घेवून उघड उघड मिरवत फिरायला? की ज्याने लोकांवर या भिडे कंपनीची दहशत बसेल असं करायला यांना परवानगी दिलीच कुणी? आणि कशी? कशासाठी? ह्या देशात काही नीती, नियम, कायदे काही आहेत की नाही? स्वतंत्र देश असला म्हणून काय एखाद्या गटसमूहाला वाट्टेल तसे वागायची परवानगी द्यायची? त्यांच्या शेजारून बारक्या बारक्या काठ्या घेवून जाणारे भयभीत पोलिस पाहून त्यांची इतकी प्रचंड दया आली. वाटलं रोज अगदी मिजाशीत फिरणाऱ्या पोलिसांची आज काय ताकद आहे? आज ही भिडे कंपनी काठ्या व हत्यारे घेवून आलीय. व शेपटा आत घेतलेली पोलीस यंत्रणा, नाकर्ते व बेशरम शासन काही करू शकत नाही. हे चित्र आम्हाला काय सांगतंय? उद्या अशीच हजारो माणस आमच्या गावावर हत्यार घेवून चाल करून आली. आमची घरं दारं लुटली. आमच्या बायका मुली, आया बहिणींवर बलात्कार केले. आमच्या पोरांचे तुकडे तुकडे करून जिवंत जाळलं. तर आम्ही काय बघत बसायचं? पोलीस यंत्रणेकडे सुरक्षा मागायची? की स्वत:च हत्यार घेवून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगास सज्ज रहायचं? की मरण पत्करायच?

हे काहीजणांना अतिशयोक्ती वाटेल. पण अस घडलाय गुजरातमध्ये. मुस्लीम द्वेषानी पेटलेल्या जनतेनी असचं थैमान घातलं. अचानक क्रियेवर घडलेली प्रतिक्रिया नव्हती ती. पूर्ण जाणीवपूर्वक घडवलेले ते षडयंत्र होते. जनमानस तयार करत करतच त्यांनी रचनात्मकरित्या क्रूर गुजरात पॅटर्ण राबविला. महाराष्ट्राचा गुजरात होवू नये याची काळजी वाटणाऱ्यांनी अशावेळी फारच सतर्क राहायला हवे.

तिथेच शेजारी ‘अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट’ हे डॉ. श्रीराम गोडबोले लिखित पुस्तक विक्रीस ठेवलेले. त्या पुस्तकातील सत्यासत्यता तपासायला हवीच. पण इथचं न थांबता त्यात मांडलेले सिद्धांत व प्रमेये शास्त्रशुद्ध आहेत का हे देखील तपासावे व ते लोकांपुढे मांडावे लागतील. अर्थात सामान्य माणसांच जीवन दिवसेनदिवस त्रास व कष्टांनी वाढत चाललंय हे अगदी खरय. उपभोगाची सर्व साधने समोर दिसत असताना आजचा तरुण ती उपभोगू शकत नाही. साध्या गरजाही नीट भागवू शकत नाही. वाढती महागाई, तशातच बेरोजगारी, अल्प मोबदला, व्यवसायातील प्रचंड जीवघेणी स्पर्धा व नोकरीसाठी प्रचंड मारामार. अशा अवस्थेतील तरुण या असल्या द्वेषमुलक भाकड कथांकडे आकर्षित होतो. त्याला असं भासवलं जातंय की तुझ्या समस्यांचं मूळ मुस्लीम लोकसंख्येत आहे. किंवा त्या तरुणाच शोषण करायला शोषकांना सोपं जावं म्हणून त्याच्या डोक्यात तिसरंच फॅड घालून त्याची दिशाभूल केली जातेय. व त्यालाच एका अल्पसंख्यांक गटांच शोषण करण्यासाठी त्याच वेळी तयारही केलं जातंय. हे फार भयावह आहे.

वास्तविक त्याच्या प्रश्नांची मूळं आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणात आहेत. सरकार राबवत असलेल्या जनहितविरोधी धोरणात आहेत. अमेरिकन साम्राज्यवादी अराजकी मुक्त धोरणांचे परिणाम म्हणून वाढत्या चंगळवादात व भोगवादात आहेत. संपत्तीच्या असमान वाटपात आहेत. एकूणच भांडवलशाही मध्ये दडलेली आहेत. पण हे त्याला कोण सांगतंय? हा खरा प्रश्न आहे. त्याच डोकं फॅसिस्ट विचारांनी बरबटून टाकण्याचा डाव. दुसऱ्याची डाळ आपल्याच भातावर कशी ओढता येईल? यात आहे. हे वेगळे सांगायला नको. मग अफझलखान कबर, ग्रोधा हत्याकांड, सावरकर प्रकरण, तिरंगा प्रकरण असा सामान्यांच्या नसलेल्या प्रश्नांवर यांचे अजेंडे का हेही सांगायला नको. कारण वरील मुद्यातच या सर्व असामाजिक प्रश्नांची हवाच निघून जाते.

अफझलखानाचे पोट फाडतानाचे चित्र उघडपणे विकले जात होते. त्यासोबत खानाचे वकील कुलकर्णी याचही शिवाजींनी शिरकाण केलय असाही फोटो द्या की म्हणाव छापून या शिवप्रतिष्ठान वाल्यांना. असो, मूळ मुद्दा असा की शिवाजीना परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त होते. त्यांनी शत्रू विरुध्द लढताना त्याचा जात, धर्म कधी पहिलाच नाही. शत्रू हा शत्रू असतो. जात धर्म भेदापलीकडे ती एक सापेक्ष प्रवृत्ती असते.

प्रा. शिवाजीराव चव्हाण यांना भिडेनी कशीकाय बोलायची संधी दिली याचे आश्चर्य वाटते. फक्त १० मिनिटातच त्यांनी शिवाजी मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते. व शिवाजीचा आदर्श घेवून जगायचे तर तरुणांनी निर्व्यसनी, परस्त्रीस मातेसमान मानावे अशी मुल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. त्याला समोर बसलेल्या युवकांनी छान प्रतिसाद दिला. या प्रतिसादातच ही समोर बसलेली हजारो मुलं मुळात मुस्लीमद्वेष्टे नाहीत हे सिद्ध झाले. व या युवकांना फसवून आणलं गेलंय. शिवाजीराजेंच प्रचंड आकर्षण व आदर. गडकिल्ले पाहण्याची तितकीच हौस. व उत्सुकतेपोटी ही पोरं आली आहेत. त्यांच्या डोक्यात मात्र शिवाजी कसा मुस्लीमद्वेष्ट होता हे अगदी बेमालूमपणे पध्दतशीर घातलं जातंय. हिंदू व हिंदवी या शब्दात फरक असून मुळातच धर्मनिरपेक्ष व सर्वसमावेशक असा हिंदवी शब्दाचा अर्थ आहे. या दोन शब्दातलं साम्यच लोकांची गल्लत करतं. व हिंदुत्ववादी (ब्राह्मणवादी) लोक याचा गैरफायदा घेत आली आहेत. खरंतर शिवाजी हिंदूचा राजा असून मुस्लीम द्वेष्टा होता असे सांगून शिवाजी महाराजां सारख्या आदरणीय व्यक्तीचा उपयोग मुस्लीमद्वेषासाठी करणं हेच त्यांच प्रचंड विकृत प्रकटीकरण आहे. या त्यांच्या विकृतीकरणामुळे अगदी आत्महत्या करावीशी वाटावी इतके अस्वस्थ व व्याकुळ आम्ही झालो आहोत.

आमच्या हुशार पत्रकार मंडळीनी मात्र प्रा. चव्हाणांच्या तोंडचे शब्द मुस्लीमद्वेष्ट्या संभाजी भिडेच्या तोंडात घालून स्वत:ची अक्कल पाजळली. वस्तुत: प्राध्यापकांचे भाषण झाल्यावर भिडेंचे भाषण झाले. या भाषणात प्रा. चव्हाणांना उद्देशून भिडे म्हणाले, “ काही माणसे पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, राजकीय, सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी शिवाजी राजांवर भाषणं करतात. व लेख लिहितात. आपलं असं काय आहे? आपलं असं काही नाही. माझंच चुकल मी अशा चुकीच्या माणसाला बोलण्याची संधी द्यायला नको होती. शिवाजीराजे मुस्लीम विरोधी नव्हते? मग कुणाच्या विरोधी होते? कारगिल युद्धात पाकिस्तान्यांनी भारतावर युध्द लादलं. व या युद्धात शेकडो हिंदू तरुण मारले गेले. कुणाकडून मारले गेले? असे विचारल्यावर म्हणाल? शिवाजीराजे मुस्लिमविरोधी नव्हते.”

भिडेंच्या या तर्क दुष्टतेची निर्भत्सना करावी तेवढी थोडीच. वेगवेगळे काळ, वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी परिस्थिती याचा काही ताळमेळ इथं आहे?

सातारकर भिडेंच्या व्याख्यानाला आले नाहीत. म्हणून “ ते बसले असतील टी. व्ही. वर उघडी नागडी चित्र बघत.” अशा शब्दात त्यांनी सातारकरांची लाज व लक्तरं वेशीला टांगली. पुरोगामी सातारकर प्रतिगाम्यांच्या व्याख्यानाला जात नसतील म्हणून अशा घाणेरड्या शब्दात त्यांची निर्भत्सना करावी? शिवाजीराजेंचे वांशिक व वैचारिक वंशज याच साताऱ्यात राहतात. याचे तरी भान भिडेनी बाळगायचे होते.

पुरोगामी म्हणवणार शासन, पोलीस व समाज यांनी वेळीच या प्रतिगामी शक्तींना रोखलं नाही. तर याचे अतिशय वाईट व तितकेच दूरगामी परिणाम होतील. व हा देश ही माणस, त्यामुळे अधोगतीच्या खाईत ढकलले जातील. याचे भान प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवे इतकेच.

‘हिंदू मुस्लीम सिख इसाई, हम सब भाई भाई’

‘देश की एकता तुट रही है नौजवानो एक हो’

‘धर्मनिरपेक्षतेचा विजय असो’

‘स्वातंत्र्य, लोकशाही, बंधुता झिंदाबाद’

‘समाजवाद झिंदाबाद’

‘साम्राज्यवाद, सांप्रदायिकता, आतंकवाद मुर्दाबाद’

जिथ विश्व हेच एक खेडेगाव बनावं असा वैज्ञानिक चमत्कार घडू पाहताना वरील घोषणाच अधिक योग्य आहेत असं नाही वाटतं? समताधिष्टीत शोषणमुक्त समाजातच समाजाचं खर सुख आहे असं नाही वाटत?

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

Contact Us