घुसमट

 शोषणाचे मूळ मानसिकतेत

ब्राह्मणी धर्माने ज्या जाचक अटी समाजावर लादल्या त्या समाजावर इतक्या खोलवर बिंबल्या आहेत. की त्यामुळे समाज एक मोठी घुसमट सहन करत आहे. प्रत्येक जण या घुसमटीने हैराण झाला आहे. तरीही तो स्वत:च कोणा इतरांच्या घुसमटीचे कारण बनत आहे. कुटुंब हा या व्यवस्थेचा महत्वाचा दुवा असून कुटुंब संस्थेवर लादलेल्या या रूढी समाज हजारो वर्षे पाळत आलाय. त्यामुळे या रूढी समाजाच्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आपण आपल्याही नकळत कुणाचे तरी शोषण करत आहोत. शोषण व्यवस्थेचे घटक आहोत. शोषण व्यवस्थेला मदत करत आहोत हे व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. त्याबरोबरच आपलेही शोषण होतेय आणि ते आपले प्रियजन करत आहेत. हे देखील त्याच्या लक्षात येत नाही. कारण  शोषण व्यवस्थेचे मुख्य युनिट म्हणजे कुटुंब संस्था होय. आपलेच आई वडील, भाऊ बहिण, नवरा किंवा बायको, नातेवाईक, मुले, शेजारी हे आपले शोषण करत आहेत किंवा आपण आपल्या ही नकळत त्यांचेही शोषण करत आहोत. किंवा त्यास हातभार लावत आहोत हे व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. कसे ते पाहू.

नवविवाहित जोडपे.

यामध्ये महत्वाचे बंधन म्हणजे विवाह कुणाशी करावा व कुणाशी करू नये? हे आई वडील ठरवतात. त्याही पलीकडे विवाहित जोडप्याने कसा संसार करावा हे देखील आई वडीलच नियंत्रित करतात. या आई वडिलांवर नातेवाईक आणि शेजार पाजाऱ्याचे इतके नियंत्रण असते. की प्रत्येकाला आपापली मुले नियंत्रणात ठेवणे भाग पडते. अन्यथा जीवन नकोसे होईल अशी अवस्था जातभाई आणि शेजारी त्या कुटुंबावर आणतात.

याचे ठळक उदाहरण म्हणजे घरातील सुनांवर होणारा जाच. सुनेने कसे राहावे, कसे वागावे याचे नियंत्रण सासू


करत असते. कपडे कोणते घालावेत, कोणते घालू नयेत इथ पासून घरातून बाहेर पडावे की पडू नये पर्यंत. कुणाशी बोलावे पासून कुणाशी बोलू नये व कसे बोलावे, कसे वागावे याचे सर्व नियंत्रण सासू करत असते. घरात कसे वागावे, कोणते काम कसे करावे, किती वाजता झोपावे, किती वाजता उठावे पासून ते सर्वच बारीक सारीक बाबींमध्ये सासूचे नियंत्रण असते. तिला हे ते नियंत्रण ठेवावे लागते कारण सुनेला वळण नाही म्हणून तिला समाज नावे ठेवत असतो.  हे नियंत्रण इतके वाढत जाते की सुनेला मारहाण, खून पासून ते ती आत्महत्येस प्रवृत्त होण्यापर्यंत हे चालते. याविरुध्द बंड म्हणून सुशिक्षित नवतरुणी विभक्त कुटुंबाची मागणी रेटून धरत आहेत आणि त्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत.

ज्यांना हे जमल नाही त्या स्त्रिया अतिशय घुसमट सहन करत आहेत. कित्येकदा नवरे देखील ते पहात असतात. पण बायकोची बाजू घेतली तर बाईलवेडा ठरवले जाईल म्हणून ते गप्प बसतात. आणि आईच हे सर्व करत असते त्यामुळे सगळीच पंचाईत होऊन बसते. खरेतर प्रियजन हेच आपल्या घुसमटीस जबाबदार असतात. दुसऱ्या बाजूला त्या मुलीच्या आई बापानीच तिला या नरकात ढकललेले असते. आणि ते तिची जबाबदारी आता झटकू लागतात. तिला दूर सारू लागतात. हे सर्व ती डोळ्यांनी पाहत असते. कित्येकदा ही लग्ने मुळातच उभयतांच्या मर्जीविरुध्द झालेली असतात. त्यांना हव्या असणाऱ्या जोडीदाराशी त्यांची लग्ने होऊच शकत नाहीत अशीच सारी व्यवस्था आहे. त्यामुळे आयुष्यभर न आवडणाऱ्या जोडीदाराबरोबर संसार करणे. जुळवून घेणे आणि अॅडजस्ट करत जीवन घालवावे लागते. त्यामध्ये हा त्रास. लोकांचा प्रचंड कोंडमारा करून टाकतो. कुटुंब हे प्रियजनांना भेटण्याचे ठिकाण न बनता तो एक अदृश्य पण जिवंत तुरुंगच बनलेला असतो. एक गुदमरून टाकणारा तुरुंग.

२. जाती अंतर्गत विवाहाची सक्ती

 विवाह हा आपल्याच जातीत करायला हवा. तो अन्य जातीतील माणसांशी करू नये याची प्रचंड सक्ती भारतीय समाजात चालते. जाताबाह्य विवाह केल्यास घरातून हाकलून देण्यापासून मुलगी आणि जावयाचा खून करणे पर्यंत हा प्रकार चालतो. काही वेळा मुलांनी पळून जावून परजातीच्या व्यक्तीशी लग्न केले म्हणून पालक स्वत:च आत्महत्या देखील करतात.

विवाहापूर्वी प्रेम प्रकरण बाहेर पडले तर मुलीला कोंडून ठेवणे, मुलास मारहाण, इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणजे आत्महत्येच्या धमक्या असे अनेक प्रकार पालक करतात. शेवटी मुलांना आई बापापुढे झुकावे लागते. प्रेमाला तिलांजली द्यावी लागते. इथे मग पालकांचा अडमुठ पण दिसून येतो. त्यातही मुलगा जर खालच्या जातीचा असेल तर त्याच्या कुटुंबियांना किंवा जाताभाईना सुध्दा उच्च जातीच्या अत्याचारास बळी पडावे लागते. हे केवळ जाती पुरते मर्यादित नसून धर्माच्या बाबतीत देखील तितकेच खरे आहे. धर्म बाह्य जोडीदारास पालकांचा आणि समाजाचा कडाडून विरोध असतो.

३. वर्ग

अगदी उघड नसला तरी हा भेद अगदी कठोरपणे पाळला जातो. मुलगी देताना पालक मुलाची आर्थिक परिस्थिती पहातात. गरीब मुलगा मुलीला कितीही आवडत असला तरी त्याच्याशी पालक तिचे लग्न लावून देत नाहीत. याच बरोबर मुलगी पहाताना हुंडा देवू शकेल, लग्न थाटामाटात करून देवू शकेल, आणि इतर बऱ्याच मागण्या पूर्ण करू शकेल अशीच वधू पाहिली जाते. गरीब मुलगी क्वचितच केली जाते. जरी सुंदर असली किंवा गुणवान असली तरी. अन्यथा तिला घरून काहीच घेवून आली नसल्याचे आयुष्यभर ऐकत राहावे लागते. किंवा जाचहाट सहन करावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. जर ती परजातीय किंवा परधर्मीय असेल तर मग विचारूच नका. तिचे हाल.

४.  समलैंगिक

समलैंगिक लोकांची तर त्याहूनही मोठी अडचण होते. विरुध्द लिंगी व्यक्ती आवडत नसूनही पालक त्यांचे जबरदस्तीने लग्न लावून देतात. आणि त्यांच्या आयुष्याची संपूर्ण वाट लावून टाकतात. जर मुलांनी ऐकले नाही तर घरातून हाकलून देतात. मारहाण करतात. डॉक्टर ते जादूटोणा पर्यंत सर्व उपचार करू लागतात. जर ऐकले नाही तर आम्ही आत्महत्या करू अशी धमकी देतात. शेवटी मुले पालकांपुढे हार मानतात. पालकांची ही बऱ्याचदा मजबुरी असते. समाज त्यांना नीट जगू देत नाही. म्हणून ते मुलांना छळत राहतात.

५. वेश्या व्यवसाय, बलात्कार आणि छेडछाड

अविवाहित मुलांवर देखील समाज खूप बंधने लादतो. त्यांना सगळे दरवाजे बंद असतात. वयात आलेल्या मुलांचा लैंगिक कोंडमारा होत असतो. तितकाच किंवा त्याहूनही अधिक कोंडमारा विवाहितांचा देखील होत असतो. त्यातूनच अनेक विकृती समाजात जन्म घेतात. स्त्रिया देवी अंगात येणे किंवा अशाच सिझोफ्रेनिक आजाराने ग्रस्त बनू लागतात. नैराश्य मूळ धरू लागते. पुरुष वेश्या वस्तीकडे पावले टाकू लागतात. मुलीची छेडछाड पासून बलात्कारापर्यंत या विकृती समाजात पहावयाला मिळतात. या विकृत पुरुषांची सोय मग मंदिरे करू लागतात. जोगातिनी आणि जोगते हे या विकृत पुरुषांची लैंगिक भूक भागवू लागतात. समलैंगिक पुरुष मग हे जोगते (हिजडे) जवळ करतात. एक समाजमान्य / धर्ममान्य व्यभिचार अखंड चालूच राहतो.

कोण जाबाबदार याला? समाज? धर्म ? की आई बाप?

अर्थात धर्म. धर्माने ही बंधने समाजाच्या इतकी खोलवर रुजवलेली आहेत की समाज सर्व नियंत्रित करू लागतो. त्यास आई बाप बळी पडतात. शेवटी धर्म निर्माण कर्त्यांना काही फरक पडणार नसतो. समाजाला ही काही फरक पडणार नसतो. पण आई बापानी तरी थोडा विचार करायला हवा. ज्या पोरांना जन्माला घातले, लाडाने लहानाचे मोठे केले त्यांच्या सुखाचा विचार आई बापानी करायला हवा. समाजाच्या विरुद्ध आई बापानी आपल्या मुला बाळांसाठी उभे राहायला हवे. पण आई बाप मुलांना एकटे पाडतात. आणि नुसते एकटे पाडत नाहीत तर त्यांच्या दु:खाचे कारण बनतात. काय असे करायला हवे की त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि आई बाप आपल्या लेकरांसाठी समाजाच्या विरोधात उभे राहायला मागे पुढे बघणार नाहीत?

स्वत:ची जबाबदारी

ज्याला स्वातंत्र्य हवे आहे त्याने स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्यायला हवी. जोडीदारासाठी आई बापाची इस्टेट, पैसा, संरक्षण याचा त्यांनी त्याग करायला हवा. घर दार सोडायची तयारी ठेवायला हवी. आई बापानी जोडीदारा सकट स्वीकारावे हा आगृह धरायला हवा. ऐकत नसतील तर त्याग करण्याची तयारी ठेवायला हवी. आत्महत्येच्या धमक्या देणाऱ्या पालका विरुध्द पोलिसात तक्रार करायला हवी. त्यांना योग्य मानसिक उपचार द्यायला हवेत.

पण कित्येकदा मुले तसे करत नाहीत. ते आई बापाची कटपुतली म्हणून आयुष्यभर रहाणे पसंत करतात. आवडत्या जोडीदाराला वाऱ्यावर सोडतात. समाजापुढे मान तुकवतात. पराभव पत्करतात. मानसिक गुलामीत आयुष्य जगतात. बंडाला उभे रहात नाहीत. खर बंड

 तर आई बापा विरुध्दच कराव लागणार आहे भारतात. प्रत्येक तरुण तरुणीला. या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव कशी करून द्यायची? त्यांना बंडाला कस प्रवृत्त करायचं? हाच खरा प्रश्न आहे.

१.      काय असे करायला हवे की पालकांच्या डोक्यात प्रकाश पडेल? की जे णे करून आपल्या लेकरांसाठी समाजाच्या विरोधात उभे राहायला ते मागे पुढे बघणार नाहीत?

२.     या गुलाम तरुणांना त्यांच्या गुलामीची जाणीव कशी करून द्यायची? त्यांना बंडाला कस प्रवृत्त करायचं?

वाचकांनी वरील प्रश्नाची उत्तरे कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावीत. ही विनंती.

 

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

Contact Us