कार्यकर्ता कसा असावा 


(हा लेख कृपया मूल्यांच्या बाजूने न वाचता व्यावहारिक बाजूने वाचावा. काळ वेळेनुरूप व ठिकाणानुरूप व्यवहार वेगळा असने आवश्यक आहे. उद्दिष्टांशी गाठ झाल्याशी मतलब ...)

कोणत्याही सरकारी कार्यालयात जाताना ७ ते ८ जणांच्या ग्रुपने जावे. एकट्या दुकट्याने शक्यतो जावू नये. ग्रुपने गेल्यावर इम्प्रेशन पडते. व अधिकाऱ्यावर दबाव येतो. एकट्या दुकटयाला शक्यतो कुणी दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

अधिकारयाने आपल्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपला पेहेरावही तसाच असावा. प्लेन शर्ट सौम्य रंगाचा, गडद रंगाची प्लेन पेंट, असा प्रोफेशनल ड्रेस असावा. व्यवस्थित धुवून इस्त्री करून कपडे घालावेत. शक्यतो इनशर्ट केला असल्यास बेल्ट बेंबीच्या खाली १ इंच असावा जास्त वर किंवा जास्त खाली पेंट ओढू नये. कपड्यांची शिलाई कडक व आरामदायक असावी. जीन्स पेंट, ती शर्ट, रंगीबेरंगी भडक कपडे घालून कार्यालयात जावू नये. ढगळे, गबाळे कपडे वापरू नयेत.

शक्यतो काळा बूट वापरावा. बुटास पोलिश असावे. स्पोर्ट शूज म्हणजे पांढरे, रंगीबेरंगी बूट ऑफिसमध्ये जाताना वापरू नयेत. बूट नसल्यास चप्पल वापरण्यास हरकत नाही. स्लीपर, साध्या प्लास्टिक चपला चुकूनही वापरू नयेत. सोक्स (मोजे) धुतलेले असावेत. बूट काढण्याचा प्रसंग आला तर वास मारू नये.

केस बारीक असावेत, वाढलेले विस्कटलेले केस चांगले दिसत नाहीत, कल्ले व मिशाचे कट साधे असावेत. फिल्मी चेहरा वाटू नये. घरातून निघताना थोडी क्रीम व पावडर लावावी. पेंटच्या खिशात रुमाल असावा. ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी तोंड रुमालाने पुसावे. रुमालावर आधीच पावडर मारून ठेवली असल्यास फ्रेश वाटते. तेलकट, घामेजल्या, मळकट चेहऱ्याने शक्यतो कार्यालयात जावू नये.

शक्यतो बोडी स्प्रे किंवा पावडर अंगावर मारून मग शर्ट घालावा किंवा शर्टाच्या बाह्यांच्या आतल्या बाजूस सेंट मारावा म्हणजे मग घामाचा वास येत नाही. सेंट सौम्य रंगाचा असावा. उग्र वासाचा असू नये.

स्त्रियांनी सौम्य रंगाची प्लेन परंतु काठ असलेली साडी वापरावी. किंवा चुडीदार वापरावा. भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. फिट्ट किंवा ढगळे कपडे वापरू नयेत. साडी शक्यतो कॉटनची चांगली, साडीवर ड्रेसवर एमरोयडरी टिकल्या, आरशे इ. प्रकार नसावेत. ब्लाउज, चुडीदार फुल बाह्यांचे व सौम्य रंगातील असावेत. स्लीवलेस किंवा पारदर्शक बाह्यांचे चुडीदार, ब्लाउज वापरू नयेत. कपड्यांना व्यवस्थित धुऊन इस्त्री केलेली असावी. साडीला व ओढनीला व्यवस्थित पिन केलेले असावे. ओढणी, पदर सारखा हलवू नये.

महिलांनी केस व्यवस्थित विंचरून मग वेणी घालावी किंवा बो बांधावा. केस मोठे असल्यास वेणी घालावि. बो बांधू नये. आंबाडा केसांचा करू नये. चेहऱ्याच्या समोर उगाच केसांचा कट करू नये. चेहऱ्याला क्रीम पावडर पुरे, लिपस्टिक लावू नये. लावायची असल्यास रंग अतिशय सौम्य असावा. कानात ३ - ४ ठिकाणी टोचून घेवू नये. एकच दागिना व कानाच्या बाळी पुरे. रिंगा वापरू नयेत. नाकात हि गोल नथनी, नथ नसावी. हातात जास्त बांगड्या नसाव्यात, हाताला मेहंदी नसावी. नेलपोलिश लावू नये. लावायचे असल्यास रंग सौम्य असावा. हातात घड्याळ असावे. उंच टाचेच्या चप्पल वापरू नयेत. साध्या चपला वापराव्यात. डोळ्यात काजळ घालू नये. केसात गजरा, फुल अडकवू नये.

आपला पेहेराव व राहणीमान नेहमीच असे असावे. यामुळे आपण बुद्धिमान, टापटिपीत व सभ्य दिसतो. आपल्या राहणीमाना प्रमाणेच आपले वागणेही असावे. अन्यथा नुसत्या राहण्याचा काहीही उपयोग होणार नाही.तंबाखू, गुटखा, तपकीर, बिडी, सिगारेट, पान, सुपारी, दारू, ताडी, गांजा असली व्यसने कार्यकर्त्याने चुकूनही करू नयेत. करत असल्यास तातडीने सोडून द्यावे. तरुण कार्यकर्त्यांनी लग्न करून घ्यावे. मात्र चुकूनही प्रेम प्रकरण किंवा लफडेबाजी करू नये. या क्षेत्रात कार्यकर्त्यांच्या मागे मुली लागतात किंवा कार्यकर्तीच्या मागे मुले लागतात. त्यांना चुकूनही बळी पडू नये. कार्यकर्ता व कार्यकर्तीनेही प्रेमप्रकरणात गुंतू नये. त्यामुळे समाजात वाईट मेसेज जातो. आपल्या कामाविषयी चर्चा न होता, भलतीच चर्चा सुरु होते.

कार्यकर्त्याने मित्रांच्या सोबत अश्लील, ब्लू फिल्म पाहू नयेत, पाहण्यास एकटेही जावू नये. किंवा अश्लील साहित्य वाचू नये. कार्यकर्त्यांच्या मोबाइल मध्ये अश्लील चित्रे, फिल्मस, मजकूर नसावा. स्क्रीनवर मुलींचे फोटो नसावेत. चौकात पानटपरीवर उगाच उभे राहू नये, पोरींवर लायनी मारत फिरू नये. नजर स्थिर असावी. उगाच भिरभिरणारी नजर असू नये. अश्लील बोलू नये, शिव्या देवू नयेत.

कार्यकर्त्याने कधीही खोटे बोलू नये, कोणासही फसवू / गंडवू नये. पैशांचा व्यवहार व्यवस्थित करावा. हिशोब चोख ठेवावा. कोणासही कधीही कितीही अडचण असली तरी पैसे उसने, व्याजाने मागू नयेत व देवू नयेत. प्रमाणाबाहेर खर्च करू नये. शक्य तितकी काटकसर करावी. साधे जेवावे. साध्या गाडीने प्रवास करावा. कोणतेही शोक करू नयेत.

मल्टी लेवल मार्केटिंगच्या किंवा पैसे कमावण्याच्या कोणत्याही योजनेत भाग घेवू नयेत व लोकांना नदी लावू नये. आपले आपण कष्ट करून कमवावे. मटका - जुगार लोटरीच्या तर चुकूनही नादाला कधी लागू नये.
कार्यकर्ता सयमी असावा, त्याच्या रागावर नियंत्रण असावे. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणे, वाटेल तसे बोलणे, शिव्या देणे, मारामारी करणे या गोष्टी त्याने करू नयेत. कार्यकर्त्यांना उकसवण्याचा प्रयत्न काही वेळा होतो, कि जेणे करून त्याने चिडावे, काहीतरी बोलावे व त्याचा गैरफायदा घेतला जातो. म्हणून चिडू नये. परिस्थिती ओळखून वागावे.

सामाजिक कार्य करायला कार्यकर्त्याच्या घरातून बळ मिळत असते. म्हणून घरातले वाद स्वत:कडे कमीपणा  घेवून मिटवावेत. असे न केल्यास शत्रूचे हित साधले जाते व अंतिम नुकसान आपले होते. कार्यकर्त्याने कोणासही कधीही धमक्या देवू नयेत.

सरकारी कार्यालयात शिव्या देणे, मारहाण करणे, कार्यालयातील कोणत्याही वस्तूला हात लावणे, धमक्या देणे यापैकी काहीही करू नये. कायद्यावर व नियमावर बोट ठेवून वाद घालावा.

कार्यकर्ता ज्ञानी असावा. त्याने भरपूर वाचन करावे, वर्तमानपत्रे वाचावीत, लेख, अग्रलेख वाचावेत, भाषणे ऐकवीत, टीवी / रेडीओवरील बातम्या, माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकावेत. सरकारी कार्यालयात जावून योजनांची माहिती करून घ्यावी.

कार्यकर्त्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास असावा. आत्मविश्वास हा ज्ञानातून वाढतो. कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्या कामाची इत्यंभूत माहिती घ्यावी. त्यातील खाचा खोचा माहिती करून घ्याव्यात. मगच कामाला सुरुवात करावी. काम यशस्वी होईपर्यंत, तडीस जाईपर्यंत चिकाटी धरावी. उगाच धरसोड करू नये.

कार्यकर्त्याने स्वत:ची व कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगती कशी होयील त्याकडे लक्ष द्यावे. घरात पैशाची चनचन असेल तर कार्यकर्ता समाजकार्यात लक्ष घालू शकत नाही. ती वेळ येवू नये म्हणून सतत डोळ्यात तेल घालून कुटुंबाच्या आर्थिक सक्षमतेकडे लक्ष द्यावे.

एका कार्यकर्त्याने दुसऱ्या कार्यकर्त्याची काळजी घ्यावी. त्याची विचारपूस करावी. त्याला अडचणीत मदत करावी. त्याच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध असावेत. त्यासाठी अधून मधून संघटनेचे कुटुंब मेळावे घ्यावेत. कौटुंबिक सहल काढावी.

बदनामी हे विरोधकांचे हत्यार आहे. कार्यकर्त्याला पैसे खातो, लफडी करतो वगैरे प्रकारच्या बदनामीला तोंड द्यावे लागते. त्यास भिक घालू नये. आपली जर काहीच चूक नसेल तर बिलकुल घाबरू नये. आपण आपले काम करत जावे. थोड्या दिवसांनी लोकांना सत्य आपोआप समजते. त्यामुळे विरोधक निपचित पडतात.

काहीवेळा कार्यकर्त्यांच्या मध्ये आपसात भांडणे लावणे किंवा त्यांच्या घरात त्यांच्याशी भांडणे लावणे इ. प्रकार घडतात. कमी समज असलेल्या ज्युनियर कार्यकर्त्यांना किंवा कुटुंबियांना ते कळत नाही. काहीवेळा आपलेच लोक भांडणात आपल्याशी शत्रूसारखे वागतात. मात्र शांतपणे अपमान गिळण, त्रास सहन करणं, असुविधा, अबोला, असहकार, बहिष्कार, अविश्वास स्वीकारून शांत राहावं लागत. हळू हळू हे तुमच्या मनातील गैरसमज कोणी निर्माण केले, कसे निर्माण केले व का निर्माण केले हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागत. व ज्यांनी भांडण लावली तो माणूस आपल्या ग्रुपपासून कसा तुटेल हे पहावं व आपले हितचिंतक अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.

कार्यकर्त्याने सतत स्वत:मधील दोष दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी टीका आत्माटिका महत्वाची असते. अधून मधून एकत्र  येवून कार्याच मूल्यमापन कराव यावेळी टीका आत्मटीका करावी. जग बदलण्याची सुरुवात स्वत:पासून होते व स्वत:ला बदलण्यासाठी आपले दोष, चुका आपण कबुल करून त्यानुसार वर्तनात बदल करावा लागतो. हि प्रक्रिया सातत्याने केल्यास व्यक्ती व संघटनेचे दोष दूर होतात व आपण लवकर प्रगती पथावर पोहोचू शकतो.

आपल्या संघटनेच्या हिताशी आपण आपले व्यक्तिगत, कौटुंबिक व छोट्या ग्रुपचे हित पूरक म्हणून घ्यावे लागते. तसे बनवावे लागते, मात्र काही वेळा व्यक्ती व संघटना, कुटुंब व संघटना, ग्रुप व संघटना यांची हिते परस्पर विरोधी बनतात. अशावेळी संघटनेचे हित महत्वाचे मानावे लागते व व्यक्ती, कुटुंब किंवा ग्रुपच्या हिताला मुरड घालावी लागते.

असे न केल्यास यातून फुटीरतेला वाव मिळतो. संघटनेच्या हितापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ मोठा दिसू लागल्याने तो कार्यकर्ता विरोधी वर्तन करू लागतो. संघटनेविरुद्ध बोलू लागतो. संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडू लागतो. विरोधकांशी, शत्रूंशी हातमिळवणी करू शकतो व संघटनेतून बाहेर काढण्याच्या लायकीचा बनतो.

कार्यकर्त्याने नेत्याचा आदर करावा व सहकारयांशी प्रेमाने वागावे, नेत्यावर टीका जरूर करावी मात्र त्याचा अनादर करू नये. नेत्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्वरित पूर्ण करावी. नेत्यावर निष्ठा व प्रेम असावे, मात्र नेता क्रांतीविरोधी बोलू लागला तर त्यास पदच्युत करावे. मात्र क्रांतीचे सर्वश्रेष्ठ नेतृत्व करणाऱ्याच्या मागे आपले संपूर्ण पाठबळ लावावे.

मानव समाजाचे जीवन सुखकर करण्यासाठी संघटना असते व त्यामुळेच संघटनेचे हित सर्वश्रेष्ठ हित होय. आपण त्याग करण्याची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. प्रसंगी आपल्या प्राणांचेही बलिदान देण्यास आपण मागेपुढे पाहू नये.



Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

जातीअंत